स्वराज्यनामा ऑनलाईन : चाले, ता.मुळशी येथे भर लग्नात फटाके वाजवल्याने आग लागून २ चारचाकी आणि २ दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. लग्न लागायच्या वेळी वाजवण्यात आलेल्या फटाक्यांमुळे रानातील गवत पेटले. पेटलेल्या गवतामुळे पार्किंग केलेल्या गाड्यांना आग लागली. सर्व जण कार्यालयात असल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र गाड्या पूर्ण जळून गेल्याने गाडी मालकांच्या डोळ्यात पाणी आले होते. चाले, ता.मुळशी येथील सुभद्रा लॉन्स येथे आज दुपारी १ वाजता ही घटना घडली.
ऐन उन्हात लागलेल्या आगीमुळे उपस्थितांची मोठी धावपळ झाली. अग्निशमन यंत्रणा उपलब्ध नसल्याने कार्यालयातील टँकरने पाणी टाकून गाड्या विझवण्यासाठी उपस्थितांनी मोठ्या शर्थीने प्रयत्न केले. तर बाजूला असलेल्या गाड्या सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी मोठी धांदल उडाली होती. घटनेच्या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही.
कोथरूड येथील दीपक सातपुते यांची स्कोर्पिओ क्र. एम. एच. १२ डी.वाय. ५४४४ तर पौड येथील रवी ओंबळे यांची बलेनो कार क्र. एम. एच. १२ पी.टी. ६०७५ आणि दोन दुचाक्या (क्रमांक मिळू शकले नाहीत) ह्या पूर्णपणे भस्मसात झाल्या. घटनेनंतर फार उशिराने अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. राजाभाऊ साठे, राहूल साठे, सुभाष साठे, चंदा केदारी, उज्वला मारणे आणि उपस्थित ग्रामस्थं यांनी बचवकार्यात मदत केली.
पहा व्हिडीओ :